सत्तावन्न सालच्या बंडांत चमकलेली व्यक्ति म्हणजे झांशीची राणी लक्ष्मीबाई ही होय. मराठ्यांच्या इतिहासांत तिच्यासारखी शूर स्त्री दुसरी झाली नाहीं. हिंदुस्थानच्या इतिहासांत फ़ार तर चांदबिबी काय ती तिची बरोबरी करू शकेल. (येथे ताराबाई सारख्या महाराणीचा उल्लेख लेखक करत नाही हे आश्चर्य आहे). राणी लक्ष्मीबाईवर १८५७ सालूच्या बंडांत भाग घेण्याचा प्रसंग कसा आला तें पाहूं.
झांशीस पूर्वी पेशव्यांच्या तर्फ नेवाळकर हे कारभारी असत. पुढें पेशवाईचा शेवट झाल्यावर इंग्रजांनीं झांशीचा कारभार त्यांच्याकडेच ठेविला. तेथील संस्थानिक इंग्रजांशीं फार चांगलें वर्तत करीत. ह्या घराण्यांतील पुरुष गंगाधरराव हा इ. स. १८३७ पासून राज्य करूं लागला. काशीस दुसऱ्या बाजीरावाचा भाऊ चिमणाजी आप्पा होता. त्याच्याजवछ मोरोपंत तांबे नांवाचा कारभारी होता, त्याची मुलगी मनुबाई ही गंगाधररावाला दिलेली होती. हिला पेशव्यांच्या सहवासामुळे घोड्यावर बसणें, दांडपट्टा खेळणे, असलें मर्दानी शिक्षण मिळाले होतें, हीच ती प्रसिद्ध झाशीची राणी लक्ष्मीबाई होय.
दत्तक विधान –
हिला एक मुलगा झाला होता, ‘परंतु तो लवकरच वारला. तेव्हा एक मुलगा गंगाधररावानें दत्तक घेतला व त्याचें नांव दामोदरपंत असें ठेविलें. पुढ़ें गंगाधरपंत इ. स. १८५३ त वारला. तेव्हां डलहौसीनें दामोदरपंताचें दत्तविधान नामंजर करून संस्थान खालसा करण्याचा हुकूम दिला. हा हुकूम ऐकतांच लक्ष्मीबाई हिनें “मेरी झांशी नही देऊंगी ” असे पाणीदार उद्गार काढले. परंतु डलहौसीनें आपला हट्ट सोडला नाहीं; तेव्हां राणीनें सत्तावन्न सालच्या बंडांत निकराचा यत्न करून पाहण्याचें ठरविलें. त्या वर्षाचि अखेरीस ग्वालेर येथील शिंद्यांची तैनाती फौज तात्या टोपे याच्या नेतृत्वाखालीं बंड करून उठली, ही संधि साधून राणीनें उठावणी केली.

इंग्रजांशी युद्ध –
हैं पाहुन सर हथू रोज यानें २० मार्च १८५८ रोजीं झांशीस वेढा दिला. झांशींतील स्त्रियाही या वेळी युद्धास मदत करीत होत्या. तात्या टोपी राणीस बाहेरून मदत करीत होता. शेवटीं फितुरीमुळे इंग्रज झांशी सर करणार हैं पाहिल्यावर राणी आपल्या घोड्यावर सवार होऊन पाठीशीं आपल्या दत्तक पुत्रास घेऊन तीनशें निवडक स्वारांनिशीं सर हथू रोजच्या छावणींतून वेढा फोडुन निघाली व एकसारखी १०२ मैलांची दौड करून कालपी येथें येऊन पेशव्यास मिळाली. परंतु तेथेंही मेच्या २४ तारखेस हथू रोजच्या सैन्यानें सर्वांस गांठलें व युद्ध झालें. त्यांत पेशव्याचा पराभव झाला. तेव्हा सर्वानीं मिळून ग्वालेरकडे जावें असें राणीनें सुचविलें.
असें करण्यांत शिंद्यांची खाजगी फौज व साधल्यास खुद्द शिंदे या दोघांनाही बंडांत सामील करून ध्यावें असा राणीचा डाव होता. तिच्या कल्पनेप्रमाणें फौज सामील झाली, परंतु शिदे मात्र मिळाला नाहीं. उलट तो सर्वाशी लढला, परंतु त्याचाच पराभव होऊन त्यास इंग्रजांकडे आश्रयार्थ पळून जावें लागलें. पुन्हां ग्वालेर येथें युद्ध झालें.

ग्वालेरही इंग्रजांच्या ताब्यांत जाणार असा रंग दिसूं छागला. तेव्हां राणीनें पुन्हां फळी फोडून निसटून जाण्याचा यत्न केला. त्या वेढीं हातघाईची मारामारी होऊन राणी रणांगणीं पडली. लवकरच ग्वालेर इंग्रजांच्या हातांत आलें व बंडाचा शेवट झाला. तात्या टोपे हा पळून गेला. परंतु पुढें इ. स. १८५९ त तो सांपडला. तेव्हां इंग्रजांनीं त्यास फांशीं दिलें. नानासाहेब मात्र शेवटपर्यत सांपडला नाहीं. झाशीच्या राणीसारख्या शूर स्त्रिया उत्तर मराठेशाहीच्या आणीबाणीच्या काळात चमकल्या नाहींत व तिचें शौय अखेरचा निर्वाणीचा यत्न करण्यांत खर्ची पडावें हूँ दुर्देव होय !
लेखक –
राजाराम विनायक ओतूरकर
संदर्भ पुस्तक –
मराठ्यांचे साम्राज्य, १९३७
टीप –
सदर लेखात करण्यात आलेले ऐतिहासिक व्यक्तींचे एकेरी उल्लेख हे मूळ लेखकाने केले असून पूर्वी इतिहास लेखनाची तशी पद्धत होती. तसेच लेखात लिहिलेली मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत, त्याच्याशी संचालक मंडळ सहमत असेलच असे नाही.
