अलीकडेच गाण्याबजावण्याचा ‘नवा ध्यास’ घेतलेल्या दूरचित्रवाणी वरील एका कार्यक्रमात, एका स्पर्धकाने आपल्या गाण्यामध्ये ‘नवा आविष्कार’ घडवत, तेराव्या शतकातील ‘सुफी संत ‘ अमीर खुस्त्रो ‘साहेब’ आणि साधारण त्या काळाच्या आसपास होऊन गेलेले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज उर्फ माऊली यांच्या रचनांचा मिलाफ घडवत, लोकांना सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. यावर कडी करुन , त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणाऱ्या एका ‘विद्वान’ अभिनेत्रीने, मौला आणि माऊली हे एकच असल्याचा ‘दिव्य’ उपदेश समस्त प्रेक्षकांना केला आणि या कार्यक्रमात परिक्षक म्हणून काम पहाणाऱ्या दोन प्रसिद्ध गायकांनी देखील तिच्या या म्हणण्याला पुष्टी दिली. हल्ली या गाणीबजावणी करणाऱ्या गवयांना आणि थातुरमातुर अभिनय करणाऱ्या नट-नट्यांना, आपल्या मध्ये एक फार मोठा इतिहासकार दडला असल्याचे साक्षात्कार वारंवार होत असतात आणि मग हे असे इतिहास आणि अध्यात्माचे झटके आले, की ते आपल्या उपदेशाचे बोधामृत प्रेक्षकांना पाजताना दिसतात !
मुळातच हिंदू समाज हा अत्यंत भोळाभाबडा आहे. अध्यात्म आणि देव म्हटलं की देहभान विसरून आणि आपली विवेकबुद्धी गहाण टाकून, तो एखाद्याच्या भजनी लागतो. त्यातच अलीकडे ‘सुफी संत’, ‘अमीर खुस्त्रो’, ‘शायरी’ वगैरे शब्द कानी पडले की काही माणसं उपदेश करणाऱ्याच्या पायी लोळणंच घेतात. समोरचा माणूस ज्या माणसांची नावं घेतोय ती माणसं कोण होती ? त्यांचे विचार काय होते? खरंच त्यांचे विचार आपल्या कडील संतांशी मिळतेजुळते होते का? असा कोणताही सारासार विचार न करता, किंवा माहिती घेण्याची तसदी न घेता, तो बोलणाऱ्या माणसावर आंधळेपणाने विश्वास ठेऊन मोकळा होतो. या निमित्ताने अमीर खुस्त्रो कोण होता? त्याचे विचार काय होते? आणि ते खरंच ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांशी मिळतेजुळते होते का? हे सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच करत आहे.
हिंदुंचा भोळेपणा
एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असणे यात काही गैर नाही. देवावर विश्वास ठेवावा की न ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु या श्रद्धेचा अतिरेक झाला की काय होते ते दाखवण्यासाठी मी दोन घटना तुमच्या समोर ठेवणार आहे. या दोन्ही घटनांचे तपशील प्रसिद्ध इंग्रज पुरातत्त्वतज्ञ्न अलेक्झांडर कनिंगहॅम याने लिहून ठेवले आहेत. इ.स. १८८०-८१ मध्ये कनिंगहॅम जुन्या वास्तूंचा शोध घेत बिहार राज्यात फिरत होता , त्यावेळी त्याने पाहिलेल्या गोष्टी त्याने लिहून ठेवल्या आहेत. कनिंगहॅम लिहितो,
“बिहार मधील मधुबन या गावापासून नैऋत्येला अर्ध्या मैलावर ‘बेदीबन’ नावाचं हिंदूंचं एक देऊळ आहे. या देवळातील मूर्ती म्हणजे एक अरबी भाषेत लिहिलेला शिलालेख आहे ! येथील लोक या शिलालेखाची , ” भगवान का चरण पद ” म्हणजे “देवाची पावले” म्हणून पूजा करतात ! हा शिलालेख असलेला दगड २ चौरस फूट असून, त्याची जाडी १ फूट एवढी आहे आणि त्यावर सात ओळींचा अरबी भाषेत लिहिलेला मजकूर आहे. या शिळेवर रोज होणाऱ्या तूप आणि पाण्याच्या अभिषेकामुळे, त्यावरील अक्षरे आता पुसट झाली आहेत. परंतु मला त्या शिलालेखातील सन मात्र वाचता आला. तो “सन सबा अरबैन” म्हणजेच हिजरी सन ८४७ असा आहे. या शिलालेखात ‘महमूद’ असे नाव देखील आहे. हे नाव जर इथल्या राजाचे आहे असे धरले, तर ते हिजरी सन ८४४ ते ८६३ मध्ये येथे राज्य करणाऱ्या जौनपूरच्या महमूद शर्की या राजाचे असेल”
दुसरा असाच प्रसंग कनिंगहॅमने लिहून ठेवला आहे, तो पुढील प्रमाणे:-
सीता मढी येथून मी पश्चिमेकडे प्रवास करत असताना, तिथे एका ठिकाणी नुकत्याच पडलेल्या उल्केची बातमी मला समजल्यामुळे, त्या ठिकाणाला भेट देण्यासाठी मी निघालो. २ डिसेम्बर १८८० रोजी ‘अंधार’ नावाच्या एका छोट्या खेड्याजवळ दुपारी चार वाजण्याच्या सुमारास, बंदुकीची गोळी झाडल्यासारखा आवाज आला, आणि दोन ब्राह्मणांनी आकाशातून एक दगड खाली पडताना पाहिला ( उल्का ) . त्यांनी तो दगड उचलला तेव्हा तो हाताला अद्याप गरम लागत होता. मी ३० डिसेंबर रोजी सकाळी त्या गावात पोहोचलो तेव्हा पाहिले की लोकांनी त्या उल्केची ‘अद्भुतनाथ’ या नावाने पूजाअर्चा करायला सुरवात केली होती ! त्याच दिवशी एका गावकऱ्याला त्या ठिकाणापासून पश्चिमेकडे अर्ध्या मैलावर असलेल्या शेतात उल्केचा दुसरा एक तुकडा सापडला. पहिली उल्का ज्या दिशेकडून आली होती त्याच दिशेला हा तुकडा सापडला आणि तो पहिल्या उल्केच्या भागावर चपखल बसल्यामुळे तो त्या उल्केवर बसवण्यात आला. मी हा दगड पाहिला तेव्हा त्याचा घेर १६ ३/४ इंच होता. त्याची लांबी ६ १/४ इंच एवढी होती . रुंदीला तो साडेचार इंच होता आणि त्याची उंची देखील तेवढीच होती. “
(संदर्भ :- Report of Tours in North and South Bihar in 1880-81, VOL XVI , Alexander Cunningham )
संपूर्ण भारतातील अशी शेकडो उदाहरणे देता येथील, वानगी दाखल येथे फक्त दोन दिली आहेत. तात्पर्य काय, तर हिंदू लोकांना पूजाअर्चा करण्यासाठी कोणतीही वस्तू किंवा माणूस चालतो , मग ती आकाशातून पडलेली उल्का असो, एखादा अरबी भाषेतील शिलालेख असो किंवा एखादा तथाकथित सुफी संत असो. आपण कोणाला पूजतोय ? ज्या माणसाला पूजतोय त्याचे विचार काय होते ? याचा यत्किंचितही विचार न करता भोळेभाबडे हिंदू त्या वस्तूची किंवा व्यक्तीची आराधना करण्यास सुरवात करतात. यालाच कदाचित सद्गुणविकृती म्हणत असावेत ! असो. आता अमीर खुस्रो कोण होता? आणि त्याचे विचार काय होते ते पाहू.
अमीर खुस्रो
अमीर खुस्रो याचं संपूर्ण नाव अबुल हसन यामीनुद्दीन खुसरो असं होतं. त्याला अमीर खुस्रो देहलवी म्हणून देखील ओळखतात. तो प्रसिद्ध सुफी संत(?) निझामुद्दीन औलिया याचा शिष्य होता. तो बहुतकरून त्याच्या कवितांसाठी प्रसिद्ध आहे. अमीर खुस्रोचा जन्म इ.स. १२५३ मध्ये उत्तरप्रदेशातील पतियाली येथे झाला. त्यावेळी हिंदुस्थानावर दिल्ली सल्तनतीचे राज्य होते. अमीर खुस्रोचा बाप अमीर सैफुद्दीन याला त्यावेळचा दिल्लीचा सुलतान शमसुद्दीन इल्तुतमिश याने पतियाली जिल्ह्यातील थोडी जमीन इनाम म्हणून दिली होती.
सुरवातीच्या दिवसात खुस्रोने त्या काळात दिल्ली सल्तनतीवर असलेला सुलतान घियासुद्दीन बल्बन याच्या पुतण्याच्या सैन्यात नोकरी पत्करली. आपल्या कवितांमुळे तो याआधीच प्रसिद्ध झाला होता. आता सैन्यात भरती झाल्यामुळे त्याची किर्ती राजदरबारापर्यंत पोहोचली आणि त्याला सुलतानाच्या मुलांकडून कविता ऐकवण्यासाठी आमंत्रणं येऊ लागली. कालांतराने दिल्लीच्या तख्तावर जलालुद्दीन खिलजीने कब्जा केला आणि दिल्लीवर खिलजी वंशाचे राज्य सुरु झाले. जलालुद्दीन खिलजीला काव्याची आवड होती, त्यामुळे खुस्रोचे त्याच्या दरबारात चांगले बस्तान बसले.
या दरम्यानच त्याने जलालुद्दीन खिलजीने युद्धात मिळवलेल्या विजयांचें वर्णन करणारे आणि त्याची प्रशंसा करणारे ‘मिफ्ता उल फुतुह’ म्हणजे विजयांची गुरुकिल्ली नावाचे पुस्तक लिहिले. पुढे जलालउद्दीन खिलजीच्या खून करून त्याचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी गादीवर आला. त्याच्या सेवेत असताना खुस्रोने “खजाईन उल फुतुह” म्हणजे विजयांचे खजिने हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्याने अल्लाउद्दीन खिलजीने केलेली युद्ध आणि इतर प्रशासकीय कामे यांचे वर्णन केले आहे. या खजाईन उल फुतुह मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या सेनापती मलीक काफूर याच्या मलबार ( आजचा केरळ ) वरील स्वारीचे वर्णन करताना हिंदूंबद्दल आणि त्यांच्या देवतांबद्दल अमीर खुस्रो काय म्हणतो पहा :-
” कंदूर येथे हत्तींच्या शोधात असताना मलिक काफूर याला कळले की ब्रह्मस्थपुरी येथे हिंदूंचे एक मोठे देऊळ असून, त्या देवळात सोन्याची एक मूर्ती आहे आणि त्या ठिकाणी बरेच हत्ती पाळलेले आहेत. काफूरने लगेचच त्या देवळावर हल्ला केला आणि ते मंदिर जमीनदोस्त केले. तिथल्या ब्राह्मणांची आणि हिंदूंची मुंडकी काफूरने उडवली आणि त्यावेळी तिथे रक्ताचे पाट वाहिले (अमीर खुस्रो हे सर्व अभिमानाने आणि आनंदाने लिहितोय बरं का ! ) या ठिकाणी लिंग महादेवाच्या मूर्ती होत्या (शिवलिंग) त्या आत्तापर्यंत इस्लामच्या घोडदळाच्या लाथांपासून वाचलेल्या होत्या. मुसलमान सैन्याने ही सर्व लिंग फोडून टाकली आणि हे पाहून हिंदूंचा देव भगवान नारायण खाली पडला आणि इतर देव घाबरून लंका द्वीपावर पळून गेले ! या लिंगांना पाय असते तर ती देखील भितीने पळून गेली असती. या ठिकाणी भरपूर सोने आणि रत्ने मुसलमानांच्या हाती पडली. बीरधूल येथील सर्व देवळं मुसलमानांनी पाडली आणि हे ‘पवित्र कार्य’ उरकून ते १३ जिल्काद ७१० हिजरी ( एप्रिल १३११ इसवी) रोजी परतले.
(संदर्भ :- खजाईन उल फुतुह, अमीर खुस्रो, इंग्रजी अनुवाद मुहम्मद हबीब , पृ. १०३-१०४)
“मथनवी इ दावल रानी खिज्र खान” या कवितांच्या पुस्तकात अमीर खुस्रो हिंदूंबद्दल पुढील शब्दात लिहितो :-“इस्लामच्या योध्यांच्या तलवारीचे मी आभार मानतो ! त्यांच्या तलवार रुपी आगीमुळे या भूमीतील जंगले तेथे असलेल्या काट्यांपासून (हिंदूंपासून) मुक्त झाली आहेत !इस्लामच्या तलवारीच्या प्रभावामुळे इथले काफिर धुळीला मिळाले आहेत. हिंदूंमधील बलाढ्य योध्यांना पायाखाली चिरडून त्यांना जिझिया कर भरण्यास इस्लामने भाग पाडले आहे ! इस्लाममुळे हिंदूंवर एवढी नामुष्की आली आहे की इस्लामी शरिया कायद्याने जर जिझिया कर घेऊन हिंदूंना जगू दिले नसते तर हिंदू या देशातून मुळासकट नामशेष झाला असता !”
(संदर्भ :- मथनवी इ दावल रानी खिज्र खान, अमीर खुस्रो, अनुवाद रशीद अहमद सलीम अन्सारी , पृ . ४६ )
“मथनवी इ नुह सिपीहीर” या कवितांच्या पुस्तकात अमीर खुस्रो हिंदूंबद्दल पुढील शब्दात लिहितो :-“दीर्घ काळापासून कायम झालेल्या या जगरहाटी अनेक धन्यवाद ! जगाच्या या नियमानुसार हिंदू हा कायम तुर्कांचे (मुसलमानांचे) सावज बनला आहे ! तुर्क (मुसलमान) आणि हिंदू यांच्या या नात्याला एकच उपमा चपखल बसते, ती म्हणजे तुर्क (मुसलमान) हे वाघ आहेत आणि हिंदू म्हणजे हरणं आहेत ! हिंदू हा तुर्कांच्या (मुसलमानांच्या) उपभोगासाठीच उत्पन्न झाला आहे हा या जगाचा नियम आहे. तुर्काच्या मनात येईल तेव्हा तो हिंदूवरती विजय मिळवतो, त्याला पकडतो, आणि मनाला येईल तशी त्याची खरेदी-विक्री करतो. हिंदू हा सर्व बाबतीत अत्यंत नीच गुलाम असल्यामुळे त्याच्यावर जबरदस्ती करण्याची काहीच गरज नाही !
(जोर जबरदस्ती ना करताच तुम्ही त्याच्याशी हवे तसे वागू शकता !) जेवणासाठी आणलेल्या बकऱ्यावर कोणी रागावते का ? फक्त हिंस्त्र नजर रोखली असता जो मरून पडेल, त्याच्यासाठी धारदार तलवार वापरण्याची काय गरज ?”
(संदर्भ :- मथनवी इ नुह सिपीहीर, अमीर खुस्रो, अनुवाद वाहिद मिर्झा, पृ ८९, १३०-१३१ )
अमीर खुस्रोचं बरचसं साहित्य असं हिंदूद्वेषाने भरलेले आहे. आणि याचे आणि ज्ञानेश्वर माऊलींचे विचार एकाच आहेत बरं का !?
“सर्व हिंदू नरकात जाणार आहेत” – निझामुद्दीन औलिया
हे विचार दुसरे तिसरे कोणाचे नसून अमीर खुस्रोचा गुरु महान (?) सुफी संत (?) निझामुद्दीन औलिया याचे आहेत.मोईनुद्दिन चिश्ती याला वयाच्या सत्तराव्या वर्षी मुहम्मद पैगंबराचा दृष्टान्त झाला की तू लग्नाच्या बाबतीत माझ्या आयुष्याचे (सुन्नाह) अनुकरण केले नाहीस. या दृष्टान्तानंतर लगेचच चिश्तीचा शिष्य मलिक ए खिताब याने एका हिंदू राजाच्या मुलीला पळवून आणले आणि तिला बाटवून तिचे लग्न ७० वर्षाच्या चिश्ती सोबत लावून दिले. तिचे नाव बिबी उम्मतुल्ला असे ठेवण्यात आले आणि पुढे तिला चिश्ती पासून मुलं देखील झाली.
(संदर्भ:- शहाजहानचा मुलगा दाराशुकोह याने रचलेले सफीनात उल अवलिया या सुफींच्या चरित्रातील मोईनुद्दिन चिश्तीचे चरित्र, याच काळातील अब्दुल हक मुहद्दीत देहलवी याने लिहिलेल्या “अखबार उल अखयार” या पुस्तकात सुद्धा ही हकीकत दिलेली आहे. )
मोईनुद्दिन चिश्तीचा शिष्य कुतुबुद्दीन बख्तियार काकी, काकीचा शिष्य फरिदउद्दिन गंजशकर आणि गंजशकरचा शिष्य प्रसिद्ध सुफी निझामुद्दिन अवलिया. या निझामुद्दिन अवलियाने आपल्या शिष्यासोबत केलेले संवाद, “फवैद अल फवाद” या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यात निझामुद्दिन अवलिया म्हणतो की ” सर्व मुसलमान स्वर्गात आणि सर्व हिंदू (इस्लाम न स्विकारल्याने) नरकात जाणार आहेत” यावरून या पंथाची शिकवण काय होती हे तुमच्या लक्षात येईल.
सात्त्विकता आणि शांतरसाचे प्रतीक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली
वर आपण अमीर खुस्रो आणि त्याच्या गुरु परंपरेची विचारधारा काय होती हे पाहिले. आता दूरचित्रवाणीतील विद्वान अभिनेते या सर्वांची तुलना ज्या ज्ञानेश्वर माउलींशी करतात त्यांचे विचार काय होते ते पाहू :-
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें पडो । मैत्र जीवांचें ॥ २ ॥दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ ८ ॥तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥
अर्थ – आता विश्वात्मक देवाने, या माझ्या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि मला हे पसायदान ( प्रसाद ) द्यावे. ॥ १ ॥दुष्टांचे दुष्टपण नाहीसे होवो, त्यांचा सत्कर्मे करण्या मध्ये स्वायस्य वाढो. सर्व प्राणीमात्रांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण होवो. ॥ २ ॥पापी माणसाचा अज्ञानरुपी अंधार नाहीसा होवो, विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होवो. प्राणमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत. ॥ ३ ॥सर्व प्रकारच्या मंगलांचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ संत पृथ्वीवर अवतरत जावोत आणि प्राणिमात्रांना भेटत जावोत. ॥ ४ ॥जे (संत) कल्पतरूंची चालती बोलती उद्याने आहेत, चेतनारूपी चिंतामणी रत्नांची जणू गावेच आहेत, अमृताचे बोलणारे समुद्रच आहेत, ॥ ५ ॥जे कोणताही डाग नसलेले निर्मळ चंद्रच आहेत, तापहीन सूर्यच आहेत असे संतसज्जन सर्व प्राणिमात्रांचे मित्र होवोत. ॥ ६ ॥तिन्ही लोकांनी सर्व सुखांनी परिपूर्ण होऊन अखंडितपणे विश्वाच्या आदिपुरुषाची सेवा करावी. ॥ ७ ॥हा ग्रंथ ज्यांचे जीवन आहे, त्यांनी या जगातील दृष्य आणि अदृष्य भोगांवर विजयी व्हावे. ॥८ ॥यावर विश्वेश्वर गूरु श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा प्रसाद तुला लाभेल. या वराने ज्ञानदेव सुखी झाले. ॥ ९ ॥या लेखाद्वारे मी अमीर खुस्रो , त्याची गुरु परंपरा आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली यांचे विचार तुमच्या समोर ठेवले.
आता ते सारखे आहेत का वेगळे आहेत हे ठरवणे तुमचे काम आहे ! त्याचप्रमाणे यातलं अमृत कोणतं आणि विष कोणतं हे ओळखण्यास देखील आपण सुज्ञ आहात !
बहुत काय लिहिणे !
संदर्भ :-
१) Report of Tours in North and South Bihar in 1880-81, VOL XVI , Alexander Cunningham
२) खजाईन उल फुतुह, अमीर खुस्रो, इंग्रजी अनुवाद मुहम्मद हबीब
३) मथनवी इ दावल रानी खिज्र खान, अमीर खुस्रो, अनुवाद रशीद अहमद सलीम अन्सारी
४) मथनवी इ नुह सिपीहीर, अमीर खुस्रो, अनुवाद वाहिद मिर्झा
५) फवैद अल फवाद, इंग्रजी अनुवाद, अब्दुल हाफीज मुहम्मद
६) Myth Of Composite Culture , Harsh Narain
७) Islamic Jihad, M.A.Khan
लेखक:-
सत्येन सुभाष वेलणकर

अश्या आचरट सर्वधर्म समानुभावाच्या लोकांना त्यांची चूक दाखवणे जरूर आहे. अतिशय मुद्देसूद लेख आहे .
तुम्ही अतिशय योग्य शब्दात दोघांमधला हा फरक ठळकपणे दाखवून दिला आहे. माऊलींची तुलना आपल्यातल्याच कोणाशीही होऊ शकत नाही,तर या मौलामौलवींची काय कथा.त्यांचा सगळा इतिहास ,नाव कोणाचेही असो अकबर ,बाबर ,अल्लाउद्दीन ,असो किंवा हा अमीर खुसरो कवी, अन्याय ,अत्याचार ,हिंदूंचे शिरकाण व मंदीरांची तोडफोड यानेच भरलेले आहे. जो जास्त अत्याचार करतो त्याला गाझी ही पदवी देखील मिळते.
आपले टीव्ही वरील कलाकार व टीम यांनी नीट जाणून घेऊनच आपले मत मांडणे आवश्यक आहे कारण हजारोजण हा कार्यक्रम बघतात ,त्यांचा गैरसमज होऊ शकतो.
आपल्या सारख्यांनी जागरूक राहून हे वेळीच लक्षात आणून दिल्याबद्दल आपले आभार.
चँनल स्वतःच्या फायद्याचे स्क़िप्ट तयार करतात ,आणि तेच त्या कलाकारां(?)कडुन वदवुन घेतात, आणि ते तथाकथित कलाकार (?) बिनडोकपणे तेच बोलतात मानधनापायी