दक्षिण भारतीय इतिहासातील एक सशक्त अशी राजवट ‘चोल’ राजवट. यांचा प्रथम लिखित उल्लेख येतो मौर्य राजा अशोकाच्या शिलालेखात. ( इ. पू. ३ रे श.) अशोक साम्राज्याच्या सीमांवरचे चोडा, पाडा असे. दक्षिणेतील संगम साहित्य, पेरीप्लस ऑफ एरीथ्रीअन सी( इ.स.१श)मधून संदर्भ मिळतात. तर भूगोल अभ्यासक टॉलेमी ने चोलांच्या व्यापारासंबंधित दखल घेतली आहे. अश्या चोल वंशातील एक राजा अरुमोलीवर्मन ( इ.स.985- 1014) चोलांच्या राजसिंहासनावर बसल्यावर राजराजा ( राजांचा राजा) नावाने जनमानसात ओळखला जातो.

याच्या कारकिर्दीत एका भव्य शिव मंदिर निर्मितीचे आदेश दिले गेले.निर्मिती केली गेली. म्हणून या मंदिराचे ‘राजराजेश्वर’ हे नाव सुद्धा प्रचलित आहे. स्थानिक भाषेत या मंदिर स्थापत्यास ‘पेरिया कोयली’ ( मोठे मंदिर) म्हणतात. आजच्या तामिळनाडू मध्ये चेन्नई च्या नैऋत्येस ३५० कि. मी. वर असलेल्या तंजावर जिल्ह्याच्या गावी दिमाखात उभे आहे.

राजराजेश्वर मंदिर चोलांच्या वैभवाचे द्योतक आहे. दक्षिण भारतीय मंदिर स्थापत्य बांधणीतील एक नोंद घेण्याजोगी ऐतिहासिक घटना आहे. मंदिराची बांधणी ग्रॅनाईट मध्ये केली आहे जो जवळपासच्या परिसरात कुठेही आढळत नाही. परंतु हजार वर्षापूर्वी हा मंदिर बांधणी साठी उपलब्ध केला गेला.भव्य मंदिर साकार केले गेले.

दक्षिण भारतात भक्ती संप्रदायाचा विकास होत असतानाचा हा काळ. आपल्या देवतेचे महात्म्य सांगण्यासाठी विविध संप्रदायानी पुराणांमधून कथा आणल्या. या पौराणिक कथांचे मूर्तरूप म्हणजे शिल्पे होय. मंदिराच्या बाह्यांगावर गाभाऱ्याच्या भिंतीचे दोन मजले दिसतात. त्यावर अर्धस्तंभ असून मधल्या जागेत देवकोष्ठ आहेत. यामध्ये शिवपरीवार देवता, विविध अनुग्रह मूर्ती, संहारमूर्ती यांचे शिल्पांकन केले आहे.
शैव तत्वज्ञान जगतातील एक संकल्पना नटराज शिव. अज्ञानाचे प्रतीक असलेल्या अपस्मारावर अविरत नृत्य करता करता सृष्टीची नवनिर्मिती व विध्वंस करणारा नटराज शिव अप्रतिम आहे. गणेश, खुद्द शिवाचा अंश असलेला वीरभद्र, दुष्टांचे निर्दालन करणारी महिषासुरमर्दिनी, भिक्षाटनशिव, चंद्रशेखरशिव, शिव- विष्णू या दोन तत्वप्रणालींना एकत्र आणणारा हरीहर ,अर्जुनपाशुपतास्त्रप्राप्ती, कल्याणसुंदर अश्या शिवसंबंधित शिल्पांची रेलचेल मंदिराच्या बाह्यांगावर दिसते.

पुर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी दोन्ही बाजूस larger than life द्वारपाल आहेत. सभामंडपा मध्ये अनेक स्तंभ आहेत. उजेडासाठी जालवातायनाची योजना केली आहे.मुखमंडप , नंतर भव्य शिवलिंगाची स्थापना केलेले गर्भगृह आहे. गर्भगृहाभोवती सांधार प्रदक्षिणा मार्ग आहे.
नंदीमंडपातील एकपाषाणी नंदी लक्षवेधक आहे.मंदिर आवारातील तीनही बाजूस ओवऱ्या असून त्यातील भित्तिचित्रे आज संरक्षित केली आहेत. गर्भगृहावर खास द्राविड शैलीचे, आकाशाकडे झेपावणारे विमान म्हणजे शिखर आहे. कूट, शाला ,पंजर या दक्षिण स्थापत्यातील पारंपरिक घटकांचा साज चढविलेला आहे. त्यांच्या लघु प्रतिकृतींचा कलात्मक वापर शिखरासाठी केला आहे.सगळ्यात वर अष्टकोनी, एकपाषाणी स्तुपी आहे.

ज्याचे वजन सुमारे 80 टन आहे. ही स्तुपी सुमारे हजार वर्षांपूर्वी शिखरावर कशी बसवली गेली हा संशोधनाचा विषय आहे. चोल युगातील कलेचा सर्वोत्तम आविष्कार म्हणजे शिवाच्या १०८ नृत्यमुद्रा होय. याचे शिल्पांकन मंदिराच्या पहिल्या मजल्यावर केले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला नेहमीच आदराचे , उच्च स्थान दिले आहे. राजराजा चोल गुरूला वंदन करतानाचे येथील भित्तिचित्र त्याची साक्ष देते.

मंदिराच्या बाह्यांगावर कोरलेले ‘शिलालेख’ म्हणजे चोलांच्या विजयगाथा आहेत.मंदिर प्रतिष्ठापना वेळी राजाने दान केलेल्या कथा इथे शब्दबद्ध केल्या आहेत. तत्कालीन सामाजिक जीवनाच्या कथा आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची एक शाखा तंजावर मध्ये होती. मंदिराच्या प्रांगणात भोसले घराण्याची वंशावळ कोरलेली आहे. या राजांनी मंदिराची डागडुजी केली आहे. यामुळे मंदिराच्या प्रत्यक्ष जडघडणीत नाही तर नूतनिकरणासाठी मराठी माणसाचा हातभार लागला आहे.
चोल शासनकाळातील बृहदीश्वर मंदिराबरोबर गंगैकोंडचोळपुरम, दारसुरम ही मंदिरे ‘The Great Chola Temples’ म्हणून ओळखली जातात. इ.स. १९८७ मध्ये युनेस्को ने या मंदिराला ‘जागतिक वारसा’ स्थळाचा दर्जा दिला. एक प्रकारे चोलांचा गौरवच केला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.भक्ती परंपरा , चोल कालीन शिल्पकला, भित्तिचित्रकला, नृत्यकला, आर्थिक सुबत्ता, चोलांचा सागरी व्यापार, याचे अधिष्ठान म्हणजे बृहदीश्वर मंदिर होय.

लेखक –
सोनाली शहा.
